1995 साली शाळेत इ १ ली पासून विदयार्थ्यांसाठी इंग्रजी विषयाचे अध्यापन सुरु करण्यात आला. हा उपक्रम तत्कालीन शिक्षणमंत्री रामकृष्ण मोरे यांनी नंतर संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर राबवला.
मौखिक संस्कृत व स्पोकन इंग्लिश हे हि शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम आहेत.
सध्या कार्यरत असणाऱ्या मुख्याध्यपिका सौ. कल्पना वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०१६ मध्ये शाळेने १२५६ विदयार्थ्यांसह 'गीत रामायण' संगीत नृत्य नाट्य रूपात सादर करून ' वर्ल्ड रेकॉर्ड ' प्रस्थापित केले. या अभिमानास्पद कामगिरीमुळे शाळेचा नावलौकिकाच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेले आहे.
इ . १ ली ते ४ थी च्या सर्व विदयार्थ्याना संगणकाचे प्रशिक्षण शाळेत दिले जाते . तसेच आधुनिक काळाची गरज ओळखून शाळेत उभारलेल्या ई - लर्निंग कक्षाचीही सर्व शिक्षक अध्ययन - अध्यापनासाठी वापर करतात.
शाळेच्या बागेत पिकणाऱ्या भाजीचे इ. ४ थी च्या विदयार्थ्यांना वाटप केले जाते तसेच ४ थी चे विदयार्थी शाडू मातीपासून छोटे गणपतीसुद्धा बनवतात.
बँड पथक , स्वस्तिक पथक , कब- बुलबुल पथक , शिक्षक - पालक, व माता पालक संघ , गांडूळ खत व इनोरा खत प्रकल्प , शैक्षणिक सहली व क्षेत्रभेटी , मीना मंच ,मातीकाम क्रीडा मोहोत्सव , सांस्कृतिक कार्यक्रम यासारख्या विविध उपक्रमात विदयार्थी व शिक्षक वर्षभर कार्यरत असतात. शिवचरित्र प्रश्नमंजुषा आणि शताब्दी आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा हि तर शाळेची वैशिष्ठये आहेत.
शाळेतील हवेशीर मोकळे वर्ग , मोठे फळे प्रशस्त मैदान , पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय स्वच्छ व मुबलक स्वच्छतागृहे , स्वतंत्र चित्रकला वर्ग, विज्ञान प्रयोगशाळा, गणित कक्ष,माती काम वर्ग ,सुसज्ज ग्रंथालय , भरपूर शैक्षणिक साहीत्य व खेळ साहित्य या सर्व सोयी- सुविधांमुळे विदयार्थी शाळेत रमून जातात व शिष्यवृत्ती , ज्ञानांजन ,टि.म.वि. अशा विविध बाह्य स्पर्धा परिक्षांमध्ये घवघवीत यश मिळवून शाळेचा मान वाढवतात.
बौद्धिक विकासाबरोबर विदयार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी अभ्यासक्रमातील शारीरिक शिक्षणाबरोबरच तायक्वांदो व मल्लखांबाचेही प्रशिक्षण वर्ग शाळेत सुरु केले आहेत.
शाळेत उभारलेली पुणे शहराची प्रतिकृती म्हणजेच पुणे दर्शन प्रकल्प पाहण्यासाठी इतर शाळांचे शिक्षक व विदयार्थीही आवर्जून भेट देतात.
अंतरवर्गीय व आंतरशालेय सर्व स्पर्धांमध्ये भाग घेऊन विदयार्थी जसे भरपूर बक्षीसे मिळवतात तसेच अनेक शिक्षकांनीही पुणे महानगर पालिकेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवला आहे. सुशीला जोशी,कल्पना आगवणे , सुनीता जोशी, संघमित्रा बेंगळे , जयश्री लेले, सुनीता आगाशे , कल्पना वाघ यांना लोकनायक यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाला आहे. विमलाबाई परदेशी पुरस्कार , पार्वतीबाई जगताप पुरस्कार नेस्पा पुरस्कार इ . अनेक पुरस्कारांनी शिक्षक सन्मानित झाले आहेत. शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सो. जयश्री भडकमकर यांना आदर्श शिक्षिकेचा राज्य पुरस्कार मिळाला तर शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च अश्या राष्ट्रीय पुरस्काराने मान लीलाताई गोखले , ताराबाई वैशंपायन , प्रतिभा पावगी व कल्पना आगवणे या गौरवान्वित झालेल्या आहेत.
आजही १२४ वर्ष पूर्ण होऊन नावाप्रमाणेच नवीन असलेली , सतत नाविन्याचा शोध घेणारी उपक्रमशील शाळा यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करत आहे आणि भविष्यातही करत राहील असा आम्हांस सार्थ विश्वास आहे.
" इवलेसे रोप लावियले द्वारी
तयाचा वेलू गेला गगनावेरी . "